Monday, August 18, 2025

गणेशोत्सव ----- धार्मिक व सामाजिक उत्सव .... पुष्प १

 

। ओम गं  गणपतये  नमः।।

गणेशोत्सव ----- धार्मिक व  सामाजिक उत्सव ....  पुष्प १


गणपती का बसवतात?

मतप्रवाह   १ 

आपण सगळे दर वर्षी भाद्रपद महिन्यात गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपती ला थकवा येईल, आणि पाणि ही वर्ज्य होते अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नए म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती अखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात उतरविले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपती ला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवताे.

 मतप्रवाह २

एकदा सत्यलोकी सर्व देवांची सभा भरली होती, अध्यक्ष  ब्रह्मदेव होते, सभा बराचवेळ रेंगाळली त्यामुळे अध्यक्षानाच म्हणजे ब्रह्मदेवाला भलीमोठी जांभई आली आणि जांभईतुन एक अंगुष्टमात्र पुरुष बाहेर आला आणि बघता बघता अक्राळ विक्राळ झाला.

*ब्रह्म्यास जृंभा सहजात आली*|

*वक्त्रातुनी मूर्ती तदा निघाली*||

*तो दैत्य जृंभासुर  उग्र झाला*|

*तू कोण धाता पुसतो तयाला*||

जांभईतून निर्माण झालेल्या अक्राळविक्राळ लालभडक शेंदुरा सारख्या रंगाच्या दैत्याला ब्रह्मदेवाने विचारले , तू कोण आहेस ? तो म्हणाला कोण म्हणून काय विचारता ? आहो मी तुमचा मुलगाच आहे.मी तुमच्या जृंभेतुन म्हणजे जांभईतून निर्माण झालो आहे म्हणून मला जृंभासुर म्हणतात आणि माझा रंग लालभडक शेंदूरासारखा आहे म्हणून मला शिंदुरासूर असे म्हणतील . मी तुमचा मुलगा असल्यामुळे मला वरदान द्या.  

क्रोधे मदालिंगन होय ज्यासी*|

*तो मृत्यू पावो वद या वरासी*||

*लोकत्रयी सुंदर योग्य नारी*|

*ती प्राप्त व्हावी मज सौख्यकारी*|| 

असे वरदान त्या दैत्याने ब्रह्मदेवाला मागीतले आणि ब्रह्मदेवाने त्या दैत्याला वरदान दिले.

त्या दैत्याने आपल्याला मिळालेला वर खरा का खोटा ? हे पडताळून पहावे म्हणून तेथील देवांकडे तो पाहू लागला की यातील कोणाला मिठी मारून मारायचे ? ज्या ज्या देवाकडे त्याने पहायला सुरूवात केली तो तो प्रत्येकाने खाली मान घातली, एका बाजूला नारद उभे होते . नारदाकडे पाहुन नारदाना मिठी मारण्यासाठी हा दैत्य निघाला, नारदाला मिठी मारणार एवढ्यात नारदमहर्षी म्हणाले जृंभासुरा मला मारून तुझेच नुकसान होणार आहे तेंव्हा  विचार कर ? तेंव्हा जृंभासुर म्हणाला मग तुच सांग मी कुणाला मिठी मारु ? नारद म्हणाले अरे ! असे वर कधि खरे आसतात का? तुला दिलेला वर खरा का खोटा याची सत्यता पडताळून पहायची असेल तर ज्यांनी वर दिला त्यानाच मिठी मार . हे ऐकल्यावर जृंभासूर ब्रह्मदेवालाच मिठी मारायला निघाला . 

नारदाला जेंव्हा जृंभासुर मिठी मारायला आला तेंव्हा नारदानी ब्रह्मदेवाला मिठी मारुन वराची सत्यता पडताळून पहाण्याचा सल्ला दिला.त्याप्रमाणे जृंभासुर ब्रह्मदेवाकडे निघाला त्याबरोबर ब्रह्मदेव पळाले व वैंकुंठात जावुन लपुन बसले.बाकीचे सर्व देव पण पळून गेले.जृंभासुर वैकुंठात आला आणि विष्णुला म्हणाला मी माझ्या वडिलांना मारणार आहे त्याना माझ्या ताब्यात द्या. तेंव्हा विष्णु म्हणाले अरे! बाबा मुलांनी बापाला मारुनये.

जृंभासुर म्हणाला मला वराची सत्यता पडताळून पहायची आहे.

विष्णु म्हणाले मी तुला असे एक ठिकाण सांगतो की ज्या ठिकाणी  तुला दोन्ही वर पडताळून पहाता येईल.तू कैलास पर्वतावर जा, तिथे त्रिभुवन सुंदर पार्वती आहे  ती तुला मिळेल आणि शंकराला मिठी मार म्हणजे ते मरुन जातील . 

जृंभासुर कैलास पर्वतावर आला, भगवान शंकर ध्यानीअवस्थेत होते, जृंभासुराने शंकराला जागे करण्याचा प्रयत्न केला पण शंकर जागे झाले नाहीत, जृंभासुराने पार्वतीला उचलले व पळु लागला. तिथे असलेल्या नंदि व सर्व गणभैरवाने शंकराला जागे करण्या करता जोरात गर्जना केली *पार्वती पळवली धर धर महादेव* ( या वरुन पुढे गर्जना सुरु झाली *पार्वती पते हर हर महादेव*) कोलाहल ऐकून शंकर भानावर आले , घडलेला प्रकार कळला , शंकराने जृंभासुराला गाठले व शिवजी म्हणाले अरे मूर्खा बल्लात्काराने अशी दुसऱ्याची पत्नी पळवणे योग्य नव्हे ,

दैत्य म्हणाला माझ्या मनगटात बळ आहे म्हणून त्या बळावर मी हिला पळवतो आहे, असेल हिंमत तर माझ्याशी दोन हात कर मी जर हरलो तर हिला घेवून जा, तू हरलास तर मी घेवून जाईन, असे म्हणून असुराने पार्वतीला खाली ठेवले व शंकराशी भिडला , शंकराचा पराभव झाला दैत्य पुन्हा पार्वतीला घेवून पळू लागला. पार्वतीने आता  भगवान विष्णुचा धावा सुरू केला, तात्काळ विष्णू ब्राम्हण रुपात प्रगट झाले.

श्लोक कामदावृत्तः-

*श्रीहरि तदा शीघ्र धावला*|

*पार्वतीपुढे वेगी पातला*||

*विप्र होउनि पावला हरि*|

*दैत्य तिष्ठवि शीघ्र यावरी*||

 विष्णु म्हणाले बाबारे! हे तू काय करतोस , हे चांगले नाही. तो म्हणाला मी जिंकलो आहे.आता ही माझी पत्नी आहे.विष्णु म्हणाले याला पुरावा काय? साक्षिदार कोण आहे? तेंव्हा तू माझ्यासमोर परत एकदा युद्ध कर जो जिंकेल त्याची ही पत्नी. दैत्याने पार्वतीला पुन्हा खाली ठेवले आणि शंकरासोबत युद्ध सुरु केले.शंकराचा पुन्हा पराभव होतो आहे हे पाहून पार्वतीने पुन्हा विष्णुचा धावा सुरु केला.

ब्राह्मणरूपात आलेल्या विष्णुने दैत्याच्या डोक्यावर परशुनावाचे शस्त्र फेकून मारले त्यामुळे तो बेशुद्ध पडला.पार्वतीने विष्णुला ओळखले,नमस्कार करुन आपले खरे रूप प्रगट करण्याची प्रार्थना केली,विष्णु मुळस्वरूपात प्रगट झाले व पार्वतीस म्हणाले मी प्रसन्न आहे काय हवेते माग ! तेंव्हा पार्वती म्हणाली देवा तुम्हीच आता या दैत्याला ठार मारा . विष्णु म्हणाले तथास्तु  लवकरच मी तुझ्या पोटी जन्माला येवुन अवतार घेवुन या दैत्याला ठार मारेन.

पुढे भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. हा विष्णुने घेतलेला अवतार आहे म्हणून तर फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वहातात.अन्य दिवशी गणपतीला तुळस वाहीली तर पाप लागते.

 भगवान विष्णुने जृंभासुराच्या डोक्यावर परशु फेकुन मारला त्यामुळे तो बेशुद्ध पडला. पार्वतीला आशीर्वाद दिला.पार्वतीने वर मागुन घेतला की या दैत्याचा वध करण्यासाठी तुम्हीच अवतार घ्या, विष्णु म्हणाले तथास्तु ... पुढे शंकर पार्वती कैलास पर्वतावर आले. इकडे जृंभासुर शुद्धीवर आला, तो प्रचंड घाबरला आणि तिथुन पळुन गेला. कालांतराने पार्वतीला दिवस गेले उदरात गर्भ वाढत होता, जृंभासुराला बातमी कळली की त्याला मारण्यासाठी विष्णू पार्वतीच्या उदरी जन्म घेणार आहे.मायावी जृंभासुराने सूक्ष्म देह धारण करून पार्वतीच्या उदरात प्रवेश करून बाळाचे मस्तक कापून नर्मदा नदित फेकुन दिले,तेंव्हा पासून नर्मदेतील दगड लाल रंगाचे व गणपतीच्या आकाराचे झाले.

ओवीः-

*नर्मदोदकी त्यागिले शिराप्रती|* *त्याचे झाले नर्मदे गणपती ||*भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी दुपारी पार्वती प्रसूत झाली पण मस्तक नसणारा मुलगा जन्माला आला. या ठिकाणी अशी एक कथा प्रचलित आहे की पार्वतीने आपल्या अंगावरचा मळ काढून एक मुलगा बनवला, त्याला दारात बसवून ती अंघोळीला गेली,शंकराला त्या मुलाने आडवले, आणि शंकराने त्याचे डोकं उडवले वगैरे ही दंतकथा सांगितली जाते. हे ऐकल्यावर मला एक प्रश्न पडायचा की , पार्वतीच्या अंगावर एक मुलगा तयार होईल एवढा मळ साठला होता का? इतका मळ साठे पर्यंत अंघोळ केली नव्हती का ? आणि आमच्या देवता एवढ्या घाणेरड्या असतात का? पण हे असे नाही तर सत्यकथा ही आहे की जृंभासुराने या बाळाचे मस्तक तोडले होते.

ओवीः-

*भाद्रपदमासीचा शुक्ल पक्ष *चतुर्थीस जन्मला सर्वाध्यक्ष|*

*ऐकताचि पातला शंभु दक्ष *शिरहीन देखिला तो||*

 नुकतेच भगवान शिवाने गजासुराचा वध केला होता. त्याना बातमी कळली की पार्वतीच्या पोटी मस्तक नसणारा मुलगा जन्माला आला आहे, ते तात्काळ तिथे आले, सर्व देवता तिथे आल्या, मस्तकहीन मुलगा पाहून ब्रह्मदेवाला हसु आले तेंव्हा पार्वती म्हणाली,

 *ब्रह्म्या तुला भ्रांति अशी नसावी| ही कोण मूर्ती मनी ओळखावी*

 तेव्हा मस्तकहीन मुलाच्या देहातून आवाज आला की , नुकतेच माझ्या पित्याने गजासुराला ठार मारले आहे त्याचे मस्तक माझ्या शरीरास लावा.माझ्या आईने मला उचलुन थिथे न्यावे.त्या प्रमाणे गज म्हणजे हत्ती ,अनन म्हणजे मस्तक.असे ते मस्तक लावले म्हणून गजानन नाव पडले. हा भाद्रपदी सिद्धगणेश अवतार आहे. याच गजाननाने सिंधुरासुराचा वध केला म्हणून या गणपती व्रत पार्थीवगणेश पूजा व्रत म्हणून आपण करतो.ही पूजा घराघरात केली जात होती

 श्रीगणरायाची मुर्ती कशी असावी ?

 गणेशमूर्ती शाडू मातीची असावी.  तसेच ती ९ ते ११ इंचच उंचीची असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडतानासुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी.

 एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमं कुशधारिणम् ॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तम् लम्बोदरं शूर्पकर्णकं

 म्हणजेच-

 एकदन्तम्- एक दात असलेला

चतुर्हस्तम्- चार हात असलेला 

पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला 

व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा, अशी गणेशमूर्ती असावी. 

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.

घरच्या प्रमुख व्यक्तीने शक्यतो ( बिना चप्पल )घालता गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी वश्रीगणरायाची सोन्याने देवाचे औक्षण करावी व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे. ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी.

 प्रत्येक  भक्ताने विशेष  लक्षात घ्यावे की श्रीगणरायाच्या मुर्तीचे मोल हे अनमोल आहे जी मुर्ती आपणास आवडेल ती मुर्ती आपण घ्यावी देवाची मुर्तीची किंमत ( भाव) कृपया करू नये

 गजाननाने सिंधुरासुराचा वध केला म्हणून या गणपती व्रत पार्थीवगणेश पूजा व्रत म्हणून आपण करतो.ही पूजा घराघरात केली जात होती.स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या घरातील गणपतीव्रताला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या द्वारे मेळे, सभा घेऊन स्वराज्या करिता क्रांतीची ज्योत पेटवली हा सामाजिक उत्सव झाला .

गणपतीला दुर्वा का वाहतात?

एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते.

गणांचा अधिपती गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते.

गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. 

दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.. 

 ।। शुभम  भवतु । ।

 पुष्प २  उद्या  पाहू ...

No comments:

Post a Comment