उद्धरी गुरुराया ...दत्तजयंती पुष्प १२
श्री क्षेत्र गाणगापूर महात्म्य.*दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.*
*"प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥ ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥"*
*श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.*
*श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.*
*श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.*
*श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे. आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.*
*श्रीगुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर माहात्म्याची ग्वाही देताना म्हणतात,*
*“मठी आमुच्या ठेविती पादुका । पुरवितील कामना ऐका । अश्र्वत्थ वृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरू ॥*
*कामना पुरविल समस्त । संदेह न धरावा मनात ॥ मनोरथ प्राप्त होतील त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥*
*संगमी करूनिया स्नान । पूजोनी अश्र्वत्थ नारायण । मग करावे पादुकांचे अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥*
*विघ्नहर्ता विनायक । आहे तेथे वरदायक ॥ तीर्थे असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ।।*
*श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.*
*श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.*
*श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला.*
*श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.*
*इथल्या देवस्थानचे पुजारी सत्त्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मणभोजन वगैरे व्यवस्था चांगल्याप्रकारे करतात.*
*श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.*
*‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥ तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’*
*असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दु:खे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे.*
: दत्तावतार व भिक्षेचे महत्व* श्री गुरू चरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्तभक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो, म्हणून श्री गुरूचरित्राचे महत्व हे अनन्य साधारण असेच आहे. श्री गुरू चरित्राच्या पाचव्या अध्यायात माधांन्य समयी भिक्षेसाठी येणार्या अतिथी बाबत आस्था असणे गरजेचे आहे, त्यास रिक्त हस्ते पाठवू नये त्या रूपाने श्री दत्त गुरूयेऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे. माधान्ह काळी दत्तगुरू हे भिक्षा ग्रहण करतात. आजही श्री क्षेत्र गाणगापूर ईथे दत्तप्रभूंना भिक्षा दान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर ईथे मा जगदंबे कडून भिक्षा ग्रहण करतात. गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायात पीठापूर या क्षेत्री आपळराज व त्याची पत्नी सूमती यांच्या कडे श्राध्द होते, अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले श्राध्दीय ब्राम्हण जेवले नसतांना माता सूमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली त्या अतिथीदेवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला कालातंराने सूमती मातेस गणेश चतूर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभा च्या जन्माची पाचव्या अध्यायाची कथा आहे. या शिवाय श्री गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पीठापूर या क्षेत्री घडली आहे. श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावांत त्यांचे बालपण गेले जिथे त्यांनी भ्रमण केली आपल्या लिला दाखवल्या, ती स्थळे पाहणे त्यास्थळांना भेटी देणे दर्शन घेणे तिथे अनूष्ठान करणे पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचार धर्मच बनून जातो तिर्थाटनाचा हा त्यामागिल एक ऊद्देश असतो.
पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥
तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥
ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥
वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥
न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥
त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥
दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६।।
माधान्ह समयी अतिथीकाळी । दत्तात्रेययेताति तये वेळी ।
विमूख न व्हावे तये काळी । भिक्षामात्र घालिजे ।३४।।
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये
अध्यायात सुरुवातीला आणि शेवटी एकच मुद्दा अधोरेखित केला आहे की,
"अरे ! काही करू नकोस , तुझ्या सद्गुरुना शरण जा. तुझी श्रद्धा; भक्ती; एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे. कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील."
गुरुचरित्राच पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की, नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत. आपला नेमका हेतू काय आहे ? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे की संकुचित आणि अशाश्वत आहे. हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्रीगुरूचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल, हे निश्चित. आपल्या पूर्व कर्माच्या प्रतिक्रिया ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपण आणि सद्गुरु / परमात्मा एकच होऊन जाल. पण तत्पूर्वी आपणच लावलेली पापाची बीजं भोगुन संपवावी लागतात. सत्कर्माने त्या बीजांची झालेली झाडे नष्ट करता येतात पण बीज मात्र भोगूनच संपवावे लागते. पूर्वकर्माची निष्कृती झाली की मग "मी तू पणाची झाली बोळवण" अशी अवस्था येते. तुमच्यात आणि सद्गुरुत वेगळेपणा उरतच नाही. तुम्ही संपूर्ण एकरूप झालेले असता.
श्री गुरु अवतार प्रेरणादायी व मार्गदर्शक, गुरु चरित्राचे विविध पैलू
१) पूर्व जन्मस्मृती
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या दत्तप्रभुंच्या दोनहीअवताराचे वैशिष्टय, सतशिष्यास, निजभक्तास पुर्वस्मृती व रृणानुबंध ज्ञात करून देणे. बाल श्रीपादांनी मातामह श्री बापन्नाचार्यांना अगदी गणेशपुत्र लाभ, लाभाद महर्षी, सत्यरृषीश्वर, नंद यादव, भास्कराचार्य हा पुर्वजन्मींचा प्रवास दाखवत बापन्नाचार्यांनी, "सोन्या तु नेमका कोण आहेस?" असे विचारताच त्यांच्या मस्तकास स्पर्श करून प्रयाग संगमावर स्नान करणारे शोडष वर्षीयमहावतार बाबा, शामाचरण लाहिरी, कर्दळी वनांतप्रवेश करणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी, बाहेर पडणारे श्री स्वामी समर्थ, यवन वेशातील "अल्लामालीक" म्हणणारे फकिर श्रीसाईबाबा हा चलतपटकाही क्षणांत दाखविला. १६ वर्षी पिठापुर सोडताना आई सुमती महाराणींस मस्तक स्पर्श करुन महालयअमावास्येस तिला झालेले दर्शन, आशिर्वाद व वचनदाखवते झाले. वयाच्या ८ वर्षी कारंजा सोडुन काशीक्षेत्री जाण्यास श्रीनरसिंह सरस्वती स्वामी निघाले. त्यांना आईच्या मस्तकास स्पर्श करताचतिला अंबिकेची पुर्वजन्माची कुरवपुर येथील श्रीपाद दर्शन,शनिप्रदोष व्रताशिर्वाद, वचन आठवले. बीदरचायवन बादशाह गाणगापुरला व्याधी शमनार्थ आलातेंव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामिंनी "का रे रजका? कोठे असतोस?" अशी हाक मारताच त्यास पुर्वजन्मीची स्मृती झाली व कुरवपुरातील त्याचा सेवक रजकाचा जन्म, श्रीपाद दर्शन व आशिर्वाद आठवला.
२) पतीस पत्नीचे योग्य मार्गदर्शन
स्त्रीने पतीला योग्य सल्ला दिल्याची काही उदाहरणे दत्त साहित्यात आढळतात, त्यातील एक गुरुचरित्रातील म्हणजे मित्रसह राजाचे उदाहरण, सेवकरूपी राक्षसाने फसवून नरमांस वाढले आणि ऋषींनी दिलेल्या शापाने राजा निराश झाला वास्तविक राजाला यातील काहीच कल्पना नव्हती यामुळे ऋषींना शाप देण्यासाठी त्याने हातात जल घेतले असता पत्नीने त्याला परावृत्त केले आणि ते जल पायावर सोडल्याने कल्माषपाद असे त्याला नामाभिधान मिळाले होणाऱ्या, त्या पापापासून वाचविले, दुसरे उदाहरण दत्त माहात्म्यातील, विष्णुदत्त ब्राह्मणाला ब्रह्मराक्षस प्रसन्न होतो आणि म्हणतो जे मनात असेल ते मागावे असे म्हणतो, इथे विष्णुदत्त ब्राह्मणाची व्दिधा मनस्थिती होते काय मागावे, घर, पुत्र, ऐश्वर्य, परलोक, काही न सुचल्याने तो पत्नीला विचारण्यासाठी घरात येतो तेव्हा ती म्हणते, मागू नका नश्वरा । श्री दत्ताची भेटी करा । ऐशा वरा मागावे । आणि त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विष्णुदत्त ब्राह्मणाला दत्त दर्शन घडते अशी कथा आहे.
३) गरीब श्रीमंत सर्व समानच. श्रद्धा व एकनिष्ठा हाच मापदंड. श्रीगुरु ब्रम्हस्वरूपी,
एकदा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला असताना मठामध्ये सात भक्त त्यांना दिवाळी करीता निमंत्रित करण्यासाठी आले, महाराज भक्त वत्सल आहेत आणि आपले प्रेमळ बोलावणे नाकारणार नाहीत हि सर्व भक्त मंडळींना खात्री होती पण सर्व एकत्र आल्यानंतर आता गुरुमहाराज करतात त्यात कुष्ठरोगी असो किंवा इतर व्याधीग्रस्त असो श्रीगुरु त्यांना व्याधीमुक्त करतात.
गुरुचरित्र कथा प्रसंग
४) नरसिंह सरस्वती, भिक्षा मागणे हि सुद्धा लीला
काही अज्ञानी भक्तांना प्रश्न पडायचा की हा ज्या दिवशी भिक्षा नाही मागत त्यावेळी काय करत असतील ती परीक्षा पाहायला एकटा ब्राह्मण गेला आणि तिथे एक नावाडी पण होता, व्रह्मण नरसिंह सरस्वतीचा रुद्र रूप वाटलं।तो घाबरून पळून गेला पण नावडी ला भिती वाटली नाही त्याला असे दिसले की, मध्यान्हकाळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरुंची पूजा केली. मग त्या श्रीगुरुंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरुंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरुंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरुंच्यासह आत शिरल्या. त्याचक्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसमान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरुंना एका मंदिरात नेउन उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, "तू येथे कशासाठी आलास?" तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, "स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. संसारमायेत अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इह-पर कल्याण होते." त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुझे दैन्यदारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल; परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल." असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःखदारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायकामुले सुखी झाली. त्याला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. नरसिंह सरस्वती आपले वास्तव्या सोडून गाणगापूर पुरला निघेल त्या वेळी ६४ योगिनी नि प्रार्थना केली आम्हाला उपेक्षून तुम्ही जात आहात त्यावेळली महाराजांनी मनोहर पादुकां दिल्या, आणि चीर काळ वास्तव्य राहील असे सांगितलेगुरुचरित्रात ६४ योगिनींचा उल्लेख १९ व्या अध्यायात येतो . पणत्या अध्ययतील कथा समजायला १८ व्या अध्यायात ल जाऊन घ्यायचा घ्यावा लागतो. अध्याय १८ मध्ये श्रीगुरु आमरेश्वरी गरीब ब्राम्हणाचे घरी घेवाड्याच्या शेंगाची भाजी भिक्षेत घेऊन विप्राचे दारिद्र्य हरण करतात हे सर्वांना ज्ञात आहेच .तसेच भोजन पात्रही नसणाऱ्या श्री कुलकर्णींच्या घरी दगडावर कण्या घेऊन त्या कुळाचा जन्मोजन्मीचा उद्धार करतात. भिक्षा हे फक्त निमित्त भक्तांचा उद्धार हेच खरे उद्दीष्ठ!
गुरुचरित्र कथा प्रसंग व गुरु बोध
५) गुरु चरित्रातील इतर प्रसंग व गुरु बोध
गुरुचरित्र आणि दत्त माहात्म्य हे दत्त सांप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्त भक्ती हि दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या तरी चुकवू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत. पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचार संहिता. प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम, नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. चौदाव्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण म्हणतो माझं रक्षण करा, पण त्या यवन मंडळींचा नायनाट करा असा शब्दही नाही, केवळ मला सांभाळा. अठ्ठेचाळिसाव्यात त्या शेतकऱ्याला महाराज विचारतात काय इच्छा आहे? तो म्हणतो, जरा माझ्या शेताकडे अमृत दृष्टीने पहा, ते छान पिकू द्या. वास्तविक प्रत्यक्ष परमात्मा समोर प्रसन्न उभा आहे, द्या दोन चार रांजण मोहरा! असं न मागता केवळ शेत उत्तम पिकाव, धन्य आहे. वांझ म्हैस दुध देऊ लागली म्हणून ते तसंच पुढ्यात ठेवलं का?? ते तापवून मग दिलं, अगदी छोटी गोष्ट पण शिकवण देणारी. साठ वर्षे होऊनही त्या स्त्रीला कन्या रत्न झालं पण केव्हा एकदा महाराजांना भेटते आणि आशीर्वाद घेते असा प्रकार नाही. दहा दिवस झाल्यावर मग ती महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आली. सायंदेवाला महाराज म्हणाले आता इथे येऊन सेवेत राहावे, यवन सेवेत मानधन भरपूर, बासर ब्रह्मेश्वरला / कडगंचीला स्थिरस्थावर पण सर्व सोडून तो सहकुटुंब सहपरिवार गाणगापूरला आला आणि गुरुमहाराजांबरोबर राहिला. पुढे कसं होईल, नोकरी कोण देईल, काही चिंता नाही. गुरुवाक्य प्रमाण !!
रजकाला महाराज म्हणाले राज्य ह्या जन्मी हवं कि पुढे? पुढचा जन्म कोणी पाहिला आहे असा विचार त्याने नाही केला, महाराज म्हणताहेत म्हणजे होणारच !! त्यात शंका नाहीच.
६) श्री गणेश व गुरुचरित्रातील संदर्भ
गणेशाचा संदर्भ गुरुचरित्रात तीन प्रकारे गुरुचरित्रात येतो.
अ) पहिला प्रकार
अध्यायाची सुरवात गणेशाच्या नावे होते, याचा अर्थ आपण मनोभावे गणेशाचे नुसते स्मरण केल्यास विघन पळून जातात.
ब) गणेशा च सुंदर वर्णन गुरुचरित्रातील पहिला अध्यायात आहे गुरुचरित्र कारणी गुरू चरित्र लिखाण।साठी ज्ञान मिळावे हया साठी प्राथना केली आहे. हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना मी तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरीब्र्म्हादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे, हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्याा शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.
क) गोकर्ण महाबळेश्वर कथा आहे रावणा कडून लिंग घेऊन कशी स्थापना केली याच वर्णन आहे हा गुरुचरित्रातील ६ वा अध्याय त्यात गणेशाच सुंदर वर्णन आहे.
दत्तमहाराज विशेष *ॐ द्राम ॐ बीजमंत्र* । पठणे प्रगटे श्रीदत्त । ऐसें महात्म्य अद्भुत श्रीदत्ताचे आहे हो । अवतार येति आणि जाती । तैसी नोहे दत्तमूर्ती । सदा राहे पृथ्वीवरती । लोकोद्धार करवाया ।
करावया जददुद्धार । स्वयं कष्टे विश्ववंभर । श्री दत्तात्रेय अवतार । विविधरूपे राहतसे । अनेक रूपे घेवोनी श्रीदत्त संचारती जनी । जना सन्मार्ग लावूनी । मोक्षमार्गा लावीतसे ।
त्याची रूपे अनंत । झाली असती पुढे होत । सर्व धर्मात श्रीदत्त । विविधरूपे राहतसे । काशी मध्ये स्नान करी । भिक्षा मागे कोल्हापुरी । माहुरगडी शयन करी । ऐसा महिमा श्रीगुरुचा ।
कधी मलंग वेशात । कधी साधू रुपात । कधी गौर वर्णात । फिरे दत्त महास्वामी । कधी वृद्ध कधी कुमार । कधी यती दिगंबर । श्रीदत्त रूप अगोचर । विविध रूपे फिरतसे
||शुभम भवतू ||

No comments:
Post a Comment