Thursday, May 29, 2025

गुरुवाणी हाच परमेश्वराचा आदेश समजावा ...

 ।।श्री गुरू शरणं ।।

गुरुवाणी हाच परमेश्वराचा आदेश समजावा ...


श्री सदगुरु आपल्याला प्रत्येक वेळेला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. कसे वागायचे, कसे चालायचे, कसे बोलायचे, जशी वेळ येईल तसे ध्यैर्याने सामोरे कसे जायाचे? दुसऱ्यांचे ऐकावे.प्रामाणिक पणे रहायचे.कारण जीवन हे क्षणभंगूर आहे. 
माणूस जन्माला येतो.त्यावेळी तो परतीचे तिकिट बरोबर घेऊनच येतो. म्हणून जन्म आणि मृत्यू या मधल्या काळात जेवढे सकर्म,सत्कार्य करता येईल तेवढे करावे.असे नेहमी श्री सदगुरु सांगतात. परंतु आपण त्या गोष्टिंवर दुर्लक्ष देतो.आणि वेळ येते तेव्हा गडबडून जातो. काय करावे काहीच समजत नाही. मग आयुष्य भर दु:ख करत बसतो.कारण ती वेळ निघून गेलेली असते.
जीवन हे रंगभूमीवरील नाटक आहे. पडदा पडला कि संपले.
हे सर्व क्षणिक असते.  रंगभूमीवरील सादर केलेल्या नाटकाचे नाव लक्षात रहात नाही. परंतु त्या रंगमंचावर कलाकाराने सादर केलेली भूमिका कायम लक्षात रहाते.
म्हणून  जीवन हे रंगभूमीवरील नाटक आहे. 
*जीवनाची भूमिका कशी वटवायची हे शिकले पाहिजे*
खरे पाहता गुरू शिष्य घडवितात...

गुरुकडे गेल्यानंतर गुरु शिष्यावर संस्कार करतात.  ज्याप्रमाणे शिल्पकार दगडामधून मूर्ति घडवितो, तसेच गुरु शिष्याला घडविण्याचा प्रयत्न करतात.  यासाठी शिष्याने गुरूंना पूर्ण भावाने शरण गेले पाहिजे.                 

याविषयी  संत कबीर म्हणतात----
"गूँगा हूवाबावला, बहरा हुआ कान ।*
*पाऊँ ये पंगुल भया, सतगुरु मार वाण।'*

सद्गुरुची वाणी अतिशय भेदक असल्यामुळे त्यातून निघालेला उपदेशपरक बाण हृदय छेदतो. त्या शब्दरुपी बाणाने शिष्य घायाळ होतो. त्याच्यातील अंतर्बाह्य सर्व विकार गतिहिन होतात. शिष्य स्वार्थपरक विचार सोडून देतो आणि त्याची वाणी मूक होते, कान बहिरे होतात, पायातील शक्ती नाहिशी होऊन पंगू होतात. याचा अर्थ असा की, शरीरातील स्वार्थी भाव नष्ट होतात. विकाररहित स्थिती निर्माण होते. ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रिय निश्चल स्थितीत येऊन पोहचतात. इंन्द्रिय स्वतःचं कार्य विसरून परमात्म्यामध्ये एकरुप होतात. जीवन व संसारातील मोह, मायेच्या पाशातून शिष्य वेगळा होतो. संसारातील वैभवापासून दूर जाणान्या मनुष्याला वेडा म्हटल जाते. त्या स्थितीपर्यंत तो शिष्य येऊन पोहचतो म्हणजेच सद्गुरुंच्या भेदक शब्दशक्तींमध्ये इतकी प्रचंड ताकद सामावलेली असल्याचे दिसून येते..
या दोह्याची सत्यता पटवण्यासाठी   खालील कथा आपणास मार्गदर्शक ..

💐💐

फार पूर्वी एक युवक संताकडे गेला आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग कोणता ? असे विचारु लागला. तेव्हा त्या संतानी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि सांगितले की, *'अरे, तरुणा तू अगोदर प्रेम करायला शीक आणि मग माझ्याकडे ये. मगच मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.* हे ऐकताच तो युवक प्रेमाच्या शोधात देशभर भटकू लागला. एक दिवस तो एका नगरातून फिरत असतांना राजमहालाच्या खिडकीतून एका सुंदर राजकन्येकडे त्याचे लक्ष जाते. ती सौंदर्यवती राजकुमारी आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध होती. अशा सौंदर्यवती राजकुमारीला पाहताच तो युवक तिच्या प्रेमात पडतो. तिच्या दर्शनासाठी आसुसलेला युवक तीन दिवस खिडकीकडे पहात तिथेच उभा राहतो. त्याला त्यावेळी स्वत:च्या जिवाची पर्वा नसते. त्याची या अवस्थेची चर्चा सगळ्या शहरात होते. सर्व लोकांना समजतं की, त्याची ही दशा राजकुमारीच्या प्रेमात पडल्यामुळे झाली आहे. ही वार्ता राजाच्या कानावर पोहचते. राजा त्वरित त्या युवकाला दरबारात बोलावून घेतो. लोकांना वाटतं की, राजा आता त्या युवकाला मृत्युदंडाची शिक्षा होईल, परंतु राजा असं काहीच करत नाही. तो त्या युवकासमोर अट ठेवतो की, राजकुमारीवर तुझे खरे प्रेम असेल तर कड्यावरून खाली उडी टाकून दाखव.

लग्न राजकुमारीबरोबर लावून देण्यात येईल. युवक प्रेमात इतका आंधळा झाला होता की, तो उडी टाकण्यास तयार झाला. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वतःला कड्यावरून झोकून दिले. परंतु संताने अगोदरच एक लांबलचक कपड्याची झोळी बांधून ठेवली होती. युवक त्या झोळीत पडल्यामुळे वाचला. ठरल्याप्रमाणे राजा राजकुमारीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास तयार होता. पण युवकाने नकार दर्शवला. त्यामुळे राजा व इतर लोक चकित झाले. ज्या राजकुमारीसाठी त्याने कड्यावरून उडी मारली तिच्याशी लग्न करण्यास हा युवक का नकार देतो हे कुणालाच समजेना. त्यावेळी युवक संताकडे पाहून म्हणाला, *'मी फक्त प्रेम कसं करायचं हे शिकण्यासाठी आलो होतो. खऱ्या प्रेमाचा अर्थ मला समजला.' असं बोलून तो युवक संताबरोबर निघून गेला.*

अशा रितीने सद्गुरुंचा उपदेश त्या युवकाच्या वर्मी लागला आणि संसारातील मोह, मायेपासून तो सावध झाला. *संत कबिरांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरुंच्या उपदेशरुपी भेदक शब्दांमुळे शिष्य अंर्तबाह्य बदलून जातो. त्याची सद्विवेक बुद्धी जागृत होते. खऱ्या प्रेमाची अनुभूती प्राप्त होते. इंन्द्रियांची विलासी वृत्ती कमी होते. शिष्य अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. हीच खरी जीवनातील 'ऊनमनी' अवस्था मानली जाते. अशा अवस्थेतच ईश्वराची प्राप्ती सुकर होते. जीवनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार होऊन परमानंद प्राप्त होतो.*
💐💐

एक हनुमंताचे मंदिर असते.  त्या मंदिरामधील उंबऱ्याचा असणारा दगड हनुमंताशी बोलू लागतो.  “हे हनुमंता !  मला एक शंका आहे.  मला तुझा फार द्वेष वाटतो.”  हनुमान म्हणतो, “का रे बाबा ?  तुला माझा द्वेष का वाटतो ?”  त्यावेळी उंबऱ्याचा दगड म्हणतो, “हनुमंता !  अरे, तू आणि मी एकाच खाणीमध्ये रहात होतो.  तू सुद्धा एक दगड आणि मी देखील एक दगड आहे.  परंतु मी रोज पाहतो, या मंदिरामध्ये सर्व लोक तुझ्या डोक्यावर अखंडपणाने फुले वाहतात, पाणी वाहतात, तुला नमस्कार करतात, तुझ्या पायांवर डोके ठेवतात आणि तेच लोक माझ्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जातात.  असे का ?”  

यावर हनुमान उत्तर देतो – “ तुझे अगदी बरोबर आहे, पण खरं सांगू का ?  खरं तर तूच हनुमान होणार होतास.  शिल्पकाराने तुलाच हातात घेतले होते.  परंतु शिल्पकाराने पहिला घाव घातला आणि तुझे तुकडे-तुकडे झाले.  त्यामुळे तुला नाईलाजास्तव उंबऱ्याचा आकार द्यावा लागला.  नंतर त्या शिल्पकाराने मला हातात घेतले, माझ्यावर अनेक छोटे-मोठे कठीण घाव घातले.  मी ते सहन केले.  म्हणून आज मी मूर्ति झालो, लोक मला नमस्कार करतात.  बस्स !  एवढाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे.”  

म्हणून तात्पर्य एकच !  साधकाने गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये “शिष्याला शिकविणे” हे वाक्य नसून “शिष्याला घडविणे” हे वाक्य आहे.  गुरु शिष्याला अंतर्बाह्य बदलवितात.  
संत ज्ञानेश्वर सुंदर सांगतात –
*हृदया हृदय येक जालों | ये हृदयींचें ते हृदयीं घातलें |           (ज्ञानेश्वरी)

गुरु आणि शिष्य यांचे हृदय एक झाले पाहिजे, तरच गुरु त्यांच्या हृदयामधील ज्ञानामृत शिष्याच्या हृदयामध्ये प्रदान करू शकतात.  ते ज्ञान, ती अनुभूति जर शिष्याला द्यावयाची असेल, तर शिष्याचे मन सुद्धा तितके तयार पाहिजे.  ज्ञानासाठी पाया भक्कम पाहिजे. सद्गुरू विचारांशी पूर्ण समर्पण व श्रद्धा हवी एकच भावना हवी सद्गुरू आज्ञा हाच परमेश्वरी आदेश .....

।।शुभम भवतु ।।

No comments:

Post a Comment