श्री दत्तात्रेय निवास अहमदनगर
(श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज मठ नगर )
प्रचिती शृंगेरी पीठाधिशांना देखील!
इसवीसनाच्या चवथ्या शतकात श्रीमद्आद्य शंकराचार्यांनी भारतभ्रमण करुन भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. दक्षिणेकडे शृंगेरी, उत्तरेला ज्योतिर्मठ, पूर्वेला गोवर्धन पीठ जो जगन्नाथ पुरी येथे आहे, व पश्चिमेला द्वारका पीठ आहे. यापैकी सर्वात पहिले पीठ शृंगेरीला स्थापन केले. या सर्व मठात गुरु-शिष्य परंपरा आजही सुरु आहे.
अहमदनगर आणि शृंगेरीचा इतिहास असा की १९८२ साली शृंगेरी पीठाचे तत्कालीन ३५ वे पीठाधिश स्वामी श्री अभिनव विद्यातीर्थ हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरला आले होते. मात्र तेथे त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या दिनचर्येला अनुकूल नसल्याने इतरत्र शोध सुरु झाला व श्री दत्तात्रेय निवासाची माहिती त्यांना कळाली. तोपर्यंत श्री दत्तात्रेय निवास हे कोणत्याही शंकराचार्य धर्म पीठाला माहिती नव्हते.
अश्या प्रकारे शुभ दिवस उजाडला आणि शृंगेरी स्वामींचे आगमन श्री दत्तात्रेय निवासात झाले. पाऊल ठेवता क्षणी त्यांना या स्थानाच्या कडक पावित्र्याची व ईश्वरी अस्तित्वाची अनुभूती आली. आश्रमात भगवंताचे उमटलेले श्री नृसिंह सरस्वतींचे चरणकमल पाहताच त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांनी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांना आलिंगन दिले आणि -"आपने ये क्या प्राप्त कर लिया है।" असे भावोत्कट उद्गार देखील काढले. आणि श्री दत्तात्रेय निवासातील चिंतामणी पादुकांना त्रिवार साष्टांग नमस्कार केला व उपस्थित लोकांना श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज ज्यांना ते ब्रह्मचारी महाराज म्हणायचे त्यांचा अधिकार ओळखा! आणि तुम्ही फार भाग्यवान असल्याने असे गुरु प्राप्त झाले आहेत! असे मत प्रकट केले.
आशा रीतीने प्रथम प्रचिती शृंगेरी पीठाधिशांना आली!*
त्यानंतर स्वामी श्री श्री श्री अभिनव विद्यातीर्थांनी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचा दर्जा व त्यांना आलेली ईश्वरी अनुभूती ओळखून शृंगेरीला येण्याचे निमंत्रण दिले व या भेटीत अत्यंत दिव्य वस्तू ज्या अनेक काळापासून शृंगेरीच्या पूजेत होत्या त्या परमपूज्य सद्गुरुंना भेट केल्या! तसेच पुढे दर १२ वर्षांनी विजय यात्रेला निघाल्यानंतर श्री दत्तात्रेय निवासात भगवान श्री दत्तात्रेयांच्या सेवेला थांबण्याची परंपरा सुरु केली. त्यानुसार दर १२ वर्षांनी विद्यमान पीठाधिश या ठिकाणी येवून भगवान श्री दत्तात्रेयांची सेवा करतात.
असाच सुवर्ण योग पुन्हा एकदा प्राप्त झाला . २००७ साली तत्कालीन विद्यमान पीठाधिश श्री श्री श्री भारतीतीर्थ स्वामी यांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या भगवान श्री दत्तात्रेय मूर्तीची पूजा व श्री दत्त क्षेत्राचा कलशाभिषेक करण्यासाठी दिनांक १८ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत शृंगेरी पीठाचे विद्यमान पीठाधिश स्वामी श्री विधुशेखर भारती हे श्री दत्तात्रेय निवासात भगवान श्री दत्तात्रेयांची सेवा करण्यासाठी आले . तसेच आचार्यांचे आराध्य दैवत भगवान श्री चंद्र मौलेश्वराची पूजा श्री महालक्ष्मी मंडपात केली तेव्हा सर्वांनी या दुग्धशर्करा योगाचा लाभ घेतला
सन १९८५ साली श्री दत्त देवस्थान, अहमदनगर येथील आश्रमात प्रगट झालेल्या श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या "चिंतामणी पादुका".
या पादुकांचे दर्शन वर्षांतून फक्त सात विशेष दिवशी म्हणजे श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंती, श्रीरामकृष्ण जयंती, गोकुळअष्टमी, श्रीरामनवमी, श्रीशंकराचार्य जयंती अशा विशेष दिवशी होते.
नगरकरांना हे स्थान अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून परिचित आहे. मात्र याच कडक शिस्त व पावित्र्याने येथे भगवान श्री दत्तात्रेयांचे निवास असल्याची प्रचिती अनेक सत्पुरुषांना आली. तसेच भारतातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी या स्थानाला भेट देऊन या स्थानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी देह विसर्जित केल्यानंतर त्यांचे संपूर्ण आत्मतेज हे श्री दत्तात्रेय निवासात ठेवले आहे. ही प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे! अनेक दत्तभक्तांनी याचा अनुभव घेतला आहे व घेत आहेत
आपणही एकदा या पवित्र व प्रासादिक ठिकाणी दर्शन घेऊन प्रासादिक अनुभूती घ्यावी .
|| शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment