Tuesday, May 6, 2025

धन्य ते गुरू व धन्य ते शिष्य

 



          धन्य ते गुरू व धन्य ते शिष्य

 ....पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वा मध्ये विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले. आणी पदमावती ला आणले. तेथेच जमीन खणुन महाराज यांचे शरीर त्या जमीनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगारया वर हार व फुले होती.

जसा जसा अंधार पडायला लागला होता, तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले. कारण त्या काळी १९४७ साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणी इतर जंगली प्राणी होते.

त्यामुळे महाराजांची भक्ती करणे वेगळे आणी आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले. त्यांचे शरीर आपण विधीवत पुरले. आता आपले काम झाले. शेवटी आपला पण संसार आहे, असा विचार करत हळूहळू सर्व जण निघून गेले.

रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांची समाधी जवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता.

त्या शिष्याने विचार केला की,

जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधी वरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणी खाल्ल तर?

आपल्या लाडक्या गुरूच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य, तेथुन घरी परत गेला नाही.

रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवुन लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भिता तेथेच समाधीचे रक्षण करत राहीला.

काय त्या शिष्याचे धाडस बघा.

तुम्ही जर एकच रात्र एकटे एखाद्या जंगलात जेथे रानटी कुत्रे व इतर जंगली प्राणी आहेत, त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की, त्या शिष्याने काय धाडस केले होते.

दुसरे दिवशी सकाळी त्याने विचार केला की, आता आपल्याला महाराजांच्या समाधी चे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला.

तो तेथेच थांबला. 

त्या शिष्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे महाराजांच्या समाधीची राखण करत राहीला.

त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते. की खायला अन्न ही देत नव्हते. पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की, चार पैसे मिळणार नव्हतेच. पण केवळ गुरू वरच्या अफाट प्रेमासाठी आणी आपल्या गुरूच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता.

भुक लागली की, त्या जंगलात दुरवर कोठे तरी चार पाच घरे होती, त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे आणी परत महाराजांच्या समाधी जवळ यायचे. सात आठ दिवस झाले.

इकडे त्या शिष्याची बायको, नवऱ्याला सगळी कडे शोधायला लागली. तीला काळजी पडली की, आपला नवरा घरी का आला नाही? कुठे गेला?

ती बिचारी नवरयाला शोधत शोधत महाराजांच्या समाधी जवळ आली. तर तीने पाहीले की, आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधी जवळ बसून आहे. तीने नवरयाला घरी परत येण्यासाठी विनवले. पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला.

आपला नवरा आता ऐकणार नाही. हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्या बरोबर च समाधी जवळ राहण्याचा निर्णय घेतला.

त्या गुरूवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधीभोळी बायको, तीने विचार केला की, जेथे माझा नवरा राहिल तेथेच मी पण रहाणार.

तीने घरी जाऊन थोडी फार भांडी घेऊन आली. दोघांनी तेथेच छोटीसी झोपडी ऊभी केली. आणी तेथेच राहु लागले.

आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणी त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको.

ऊन्हाळ्यात महाराजांच्या समाधी ला उन लागु नये म्हणुन त्याने छत्री दिवसभर धरली तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट यायचे. तेथे त्याकाळी भरपूर उतार होता.

त्या पाण्याच्या लोटाने समाधी वरची माती वाहून जाऊ नये म्हणून, तो वेडा शिष्य त्या समाधी च्या वरच्या भागावर आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट, त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले पण गुरूच्या समाधीला काही होऊ दिले नाही.

असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे!

काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधी चे दर्शन घ्यायला आले होते. त्यांनी पाहीले की, तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते?

मग त्यांनी एकत्र येऊन समाधी भोवती विटांचे बांधकाम केले. वरून पत्रा टाकला.

हळूहळू काळ बदलला. तेथे जंगल कमी होऊन माणसे रहायला आली.

पंचवीस वर्षा नंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे. ते मंदिर ऊभे राहीले.

कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य होता

प.पु.बाबुराव रूद्रकर!

हा लेख जे वाचत आहेत त्यांना पदमावती चा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीत असेल पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणारया बाबुराव रूद्रकर यांचा रूद्र शंकर मठ भारती हाॅस्पीटल जवळ आहे. हे माहित नसेल.

जी माणसे शंकरमहाराज यांना नावे ठेवतात, त्यांनी या रूद्कर यांच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचा जरूर विचार करावा.

शंकर महाराज हे दिव्य पुरूष होते. त्यांनी खुप चमत्कार केले. ते चमत्कार रूद्रकर यांनी स्वतः पाहीले. अनुभवले.

रूद्रकर यांच्या लक्षात आले की,

हा माणूस वेडा नाही तर खुप मोठा योगी आहे. यांच्या कडे दैवी शक्ती चे अस्तित्व आहे. म्हणुनच रूद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरू मानले. आणी त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली.

बाबुराव रूद्रकर यांनी १९८५ मध्ये आपला देह ठेवला.

धन्य ते गुरू शंकर महाराज

आणी धन्य ते शिष्य बाबुराव रूद्रकर

असा गुरू होणे नाही आणी असा गुरूवर अफाट प्रेम करणारा शिष्य ही होणे नाही.
 
||जय शंकर||

No comments:

Post a Comment