Thursday, April 17, 2025

देवाचे तिर्थ कसे ग्रहण करावे ?

 


देवाचे तिर्थ कसे ग्रहण करावे ?


 देवाचे तीर्थ ग्रहण करण्याचा विधी कोणता ? तीर्थग्रहणाविषयी कोणते संकेत व प्रथा आहेत ?


देवपूजा झाल्यावर तीर्थग्रहण करणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. एखाद्या मंदिरात गेल्यावर तेथील पूजारी भक्तगणांस तीर्थ देतात. हे तीर्थ उजव्या हातात घेताना हाताची गोकर्ण मुद्रा करावी. म्हणजे अंगठ्यापाशी तर्जनी किंचित वाकवून तिच्या पृष्ठावर एकामागे एक येतील अशी बाकीची तीन बोटे ठेवावीत. देवतीर्थ नेहमी आत्मतीर्थावरून ग्रहण करावे. आपल्या उजव्या हातात मध्यभागी अग्नितीर्थ, मध्यमेच्या मुळाशी देवतीर्थ, अंगठ्याजवळ पितृतीर्थ, त्याच्या विरूध्द बाजूस करंगळीकडे ऋषितीर्थ व मनगटाजवळ आत्मतीर्थ असते. देवतर्पण, दान, संकल्प, देवतीर्थाने करावे. पितृतर्पण व ऋषितर्पण अनुक्रमे पितृतीर्थाने व ऋषितीर्थाने करावे. पुरोहित लोकांनी दक्षिणा, दान, संभावना अग्नितीर्थावर घ्यावी. त्याचप्रमाणे साधकांनी देवाचे तीर्थ प्रथम अग्नितीर्थावर म्हणजे तळहाताच्या खोलगट भागात घेऊन ते आत्मतीर्थाने तोंडाचा आवाज न करता प्राशन करावे. तीर्थ म्हणून घेतले जाणारे उदक किंवा पंचामृतयुक्त उदक फक्त एखादा थेंबच असावे. कारण तीर्थाचे रूपांतर मलामध्ये होऊ नये असा संकेत आहे. त्यामुळे एखादा दुसरा थेंब घेतल्यास त्याचा मुखातील अंतर्भाग, अन्ननलिका व जठर यांना लेप होतो. त्याचे अन्नाशी मिश्रण होत नाही.

तीर्थग्रहण कितीदा करावे याविषयी संकेत आहेत. सामान्यतः घरातील पूजा केल्यावर दोनदा तीर्थग्रहण करावे. त्यादिवशी अन्नग्रहण होणार नसेल तर तीनदा तीर्थग्रहण करावे. मंदिरात गेल्यावर एकदाच तीर्थ घ्यावे. साधन एकादशीचे व्रत करणारे काही साधक एकादशी दिवशी कडक उपवास करून दुसरे दिवशी सूर्योदयास तीर्थ घेऊन उपवास सोडतात. घरात नैमित्तिक सत्यनारायणासारखी महापूजा किंवा श्राध्द असेल तर त्या दिवशी तीर्थ सकाळच्या नित्य देवपूजेनंतर लगेचच न घेता ते महापूजा किंवा श्राध्द झाल्यावर आपण भोजनास बसण्यापूर्वी घ्यावे. कारण त्यामुळे देवगौरव व पितृगौरव साधला जातो.

नित्य देवपूजेचे तीर्थ एका चांगल्या द्विमुखीमध्ये (झारीत) ठेवावे. दिवसभरात काही प्रसंग पडल्यास ते तीर्थ घेता यावे. एखाद्या व्यक्तीचा निधनकाल जवळ येऊन ठेपला असेल तर तुळसीपत्र आणि देवतीर्थ मुखात घालावे. एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यावर देखील तीर्थ प्राशन करवावे. दिवसातून कुटुंबिय मंडळींपैकी एखाद्याच्या हातून पैशुन्य (चहाडी), परपीडन, वाक्ताडन, परनिंदा यासारखे अपराध घडल्यास त्याला प्रथम देवतीर्थ द्यावे व नंतर यथावकाश इतर प्रायश्चित्त द्यावे.

ज्या दिवशी पंचामृत अभिषेक होईल त्या दिवशी दिवसभर जतन करून ठेवण्यासाठीचे तीर्थ मूर्तींच्या चरणांना उदकस्पर्श करून ते शुध्दोदक तीर्थ म्हणून ठेवावे. कारण पंचामृतयुक्त तीर्थ जतन केल्यास ते संध्याकाळपर्यंत दूषित होते. तीर्थ प्राशन केल्यावर तो हात आपल्या मस्तकावरून फिरविण्याची प्रथा आहे. कारण देव व देवतीर्थ या दोन्ही विषयीचा गौरव व्यक्त होतो. पण पंचामृतयुक्त तीर्थ घेतल्यावर त्याचा हात मस्तकावर फिरवू नये. त्यामागील  वैज्ञानिक कारण म्हणजे पंचामृतातील मधासारखी रसायने केसावर अनिष्ट परिणाम करू शकतात. त्यातील साखरेसारखे गोड पदार्थ केसांना लागल्यास मुंग्यासारख्या प्राण्यांपासून उपद्रव होण्याची शक्यता असते. घरातील तीर्थप्राशन करण्यापूर्वी ते तीर्थ किंवा शुध्द पाणी शंखात ठेवून तो शंख देवाभोवती ओवाळावा. नंतर ते शंखातील तीर्थ हातात घेऊन खालील मंत्र म्हणावा-

शंखमध्ये स्थितं तोयं भ्रामितं अमुकोपरी । अंगलग्नं मनुष्याणां महापापं व्यपोहति ।।१।।*
अकालमृत्यू हरणं सर्वव्याधिविनाशनम्। अमुक पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम् ।।२।।*

शंखोदक न घेता नूसत्या पळीने तीर्थ घ्यावयाचे झाल्यास फक्त दुसरा मंत्रच म्हणावा. "अमुक" या पदाऐवजी त्या त्या देवाचे नांव घ्यावे. उदा. केशवोपरि, गणेशोपरि, अंबिकोपरि, आदित्योपरि इत्यादि. शिवाचे उदक शंखाने घेऊ नये. दुसऱ्या मंत्रात "अमुक" पदाऐवजी विष्णू पादोदकं, शिवपादोदकं, गणेशपादोदकं, सूर्यपादोदकं, देवीपादोदकं इ. रचना करावी.*

तीर्थग्रहण हा पूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. प्राशन केलेजाणारे तीर्थ आरोग्यदृष्ट्या अत्यंत शुद्ध असणे आवश्यक आहे. बरेच दिवस पूजा झालेली नाही, अशा देवांच्या मूर्तीवरील तीर्थ प्राशनास अयोग्य ठरते. त्याचप्रमाणे देवांच्या गंधात किंवा देवांच्या मूर्तीवर कुंकू, शेंदूर, निकृष्ट प्रकारचे अष्टगंध, गुलाल (रंग), बुक्का इत्यादी द्रव्ये असलेले तीर्थही प्राशनास अयोग्य ठरते. काहीवेळा गणपतीवरील शेंदूर तीर्थातून पोटात जाताच कायमचा घशाचा रोग जडल्याची उदाहरणे आहेत. अभिषेकाचे तीर्थ संकलित करावयाचे झाल्यास पूजाकर्त्याच्या बैठकीपासून अभिषेकाचे ताम्हण किमान एक प्रादेश (वीतभर) दूर असावे. नाहीतर पूजा करताना पूजाकर्त्याच्या मुखातील लाळेचे थेंब ताम्हणात उडण्याची शक्यता असते. म्हणून पूजेच्या पूर्वी "विष्णो देवयजनं रक्षस्व" असे म्हणून आपल्यापासून एक वीत मोजण्यास सांगितले आहे. याशिवाय आचमन व संकल्प झाल्यावरचे ताम्हणातील पाणी दुसरीकडे ओतून ताम्हण स्वच्छ केल्यावर मगच पूजेला सुरूवात करावी. म्हणून बऱ्याच ठिकाणी पूजेसाठी मोठे व आचमनसंकल्पासाठी छोटे अशी दोन ताम्हणे वापरतात. त्यामुळे पूजेतील शुध्दता व स्वच्छता राखण्यास मदत होते. तीर्थात रुद्राक्ष ठेवल्यास त्यांचा ह्रद्रोगपरिहारक म्हणून उपयोग होतो.....

।।श्री गुरुदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment