गजानन महाराजांचे प्रकटीकरण (२० फेब्रुवारी २०२५ )
वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.
शेगावीचा योगीराणा – संत गजानन महाराज यांचा कार्यकाळ: १८७८ ते १९१० हा आहे.
श्री देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याश्याच्या रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्रीगजाननविजय ह्या पोथीमध्ये आलेले आहेत.
एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळीअक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर, तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले.
त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की, स्वामी समर्थाच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उध्दार करावा व तिथेच देह सोडावा हे विसरू नको. त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिध्द कपिलधारा तीर्थावर आले व १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिध्दी दिली. या योगसिध्दीनंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या संतमेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करुन लाड कारंजा या गावी आपल्या घरी आणले. येथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे, अलंकार व भेटवस्तू देऊ लागले. बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे, अलंकार सर्व तिथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिरामबाबांजवळ आले व ४- ५ दिवस तेथे राहिले.गजानन महाराज मणिरामबाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिरामबाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मणिरामबाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेच्यावेळी मणिरामबाबांनी संत गजाननास आकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्याप्रमाणे संत गजानन महाराज आकोटला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले. दोघांनीही अंतरज्ञानाने परस्परांना ओळखले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले कि, मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थाजवळ होतो. त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले. त्यानंतर तू माझे किर्याकर्म करून शेगांवला भक्तांचा उध्दार करण्याकरिता जावे असे सुचविले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिध्दीप्राप्ती शिकविली व आपल्या काही शक़्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशाप्रकारे गजानन नरसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगांवला आले.
सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत, म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.
गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित किंबहुना त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली. दि. ०८ सष्टेबर १९१० रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले .
गजानन महाराज शेगाव संत गजानन महाराज मंदिर शेगाव
‘मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्र्वरावाचून कोणीही तारणहार नाही,’ हे ईश्र्वरीतत्त्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म, भक्ती, योग हे तीन मार्ग सांगितले आहेत. या तिन्ही मार्गांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे. हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. कारण ते ईश्र्वराचे निस्सीम भक्त होते. यामुळे ईश्र्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. परमार्थात खोटेपणाला मुळीच थारा नसतो.
परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. माघ वद्य ७ शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
"कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||
जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे,
"दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||"
जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले.
जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे,
"बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर |
लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||"
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.
श्रीगजानन महाराज रामचंद्र पाटलास गोसाव्यांच्या वेषात दर्शन देत आहेत - श्रीगजानन विजय अ. २१
श्रीगजानन विजयमध्ये वर्णिलेले चमत्कार हे एका दृष्टीने अद्भुत असले तरी सर्वस्वे अद्भुत नाहीत. तसे चमत्कार अन्य साधुपुरुषांच्या, मुक्तपुरुषांच्या चरित्रात अनेकदा आढळून येतात. विविध धर्मग्रंथातही त्यांचा उल्लेख सापडतो. उदाहरणार्थ- पंढरपूर मुक्कामी असताना बापूराव नामक महाराजांचा भक्त स्वत: विठ्ठल मंदिरात जाऊ शकला नाही. श्रीगजानन महाराजांनी त्याला विठोबाचे दर्शन घडवून दिले. इतरांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनीही महाराजांकडे दर्शनाचा आग्रह धरला. तेव्हा अगोदर बापूरावांसारखे निरागस व शुद्ध मनाचे व्हा, असे महाराज म्हणाले, पंढरपुरात कॉलऱ्याने ग्रस्त झालेल्या एका सोबत्याला सोडून जेव्हा इतर लोक जाऊ लागले, तेव्हा श्रीगजानन महाराजांनी स्वत: त्या आजारी माणसाचा पत्कर घेतला. तो बरा होईपर्यंत त्यांनी जाणे तहकूब केले. बाळापूर येथील बाळकृष्णपंत व पुतळाबाई वृद्धावस्थेत शेवटीशेवटी दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर जाऊ शकत नव्हती. स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे बाळकृष्ण उत्सवाच्या दिवशी समर्थांची वाट पाहत होते. खरोखरच समर्थांची जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी ऐकू आली आणि समर्थ बाळकृष्णासमोर उभे ठाकले. पाहता पाहता क्षणात समर्थ व क्षणात गजानन महाराज अशी दोन्ही रूपे बाळकृष्णांना दिसू लागली. एका दृष्टीने हा चमत्कार म्हणता येईल, पण दुसऱ्या दृष्टीने हा चमत्कार नाही. अशाच प्रकारचे दर्शन श्री मथुरबाबू यांना घडले असल्याचा उल्लेख श्रीरामकृष्ण-लीलाप्रसंग या ग्रंथात आहे. श्रीरामकृष्ण व्हरांड्यात फिरत होते. मथूरबाबूंचे त्यांच्याकडे लक्ष होते. पाहता पाहता मथूरबाबूंचा आपल्या डोळ्यांवर विश्र्वास बसेना. कारण एकदा शिव व एकदा श्रीरामकृष्ण असे त्यांना दर्शन घडले.
श्रीगजानन महाराजांनी गंगायमुनेचे स्मरण करताच भास्कर पाटलांच्या शेतातील कोरडी विहीर तुडुंब भरून जाणे, नर्मदेची स्मृती करताच बुडणारी नाव तरून जाणे या चमत्कारांमागेही श्रीमहाराजांची इच्छाशक्तीच होती. ही इच्छाशक्ती लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभी राहिल्याचा उल्लेख ‘श्री गजानन विजय’मध्ये आहे. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तीनांही श्रीगजाननमहाराजांबद्दल नितांत आदर होता, ही गोष्टही चमत्कारांमधील कार्यकारणसंगती दर्शवून जाते. गंगाभारतीचा सर्वांगावर उतलेला कुष्ठरोग श्रीगजाननमहाराजांनी नष्ट केला. महापुरुषांचा स्पर्शामुळे घडून आलेल्या अशा घटनांचा उल्लेख अन्य वाङ्मयांतही आढळून येतो.
श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,
"मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||."
ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंबर अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले,
"तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||."
महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत.पादुका,पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला.
![]() |
समाधी मंदिर शेगाव |
देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले,
"मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||."
यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले,
"दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||."
देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.
गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।।
या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।।
हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।
।। गण गण गणात बोते ।।
No comments:
Post a Comment