उद्धरी गुरुराया ..श्रीदत्तजयंती पुष्प ८
श्री दत्तात्रयांचे स्वरुप - एकमुखी की त्रिमुखी 
श्री दत्तात्रयांचे स्वरुप - एकमुखी की त्रिमुखी 
आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे. उपनिषदे, पुराणे व महाभारत पाहिले, तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत. इतकेच नव्हे, तर प्राचीन मूर्तिविज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत. भागवतात देवत्रयींनी अत्रिंना “यद् न ध्यायति ते वयम्” “तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत.” पुढे तेराव्या शतकापासून ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती’ असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीच झाले आहे. ‘गुरुचरित्रा’तील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीहून दत्तभक्तीची प्रेरणा मिळविणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते होते.
थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी व षड्भुज दत्तात्रेय आहेत. या मूर्तीच्या सहा हातांत शंख, चक्र, त्रिशूल, डमरू, कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहेत. या मस्तकावर जटाभार, मुकुट व कमरेला पितांबर आहे. ही मूर्ती तांब्याची असून तिचेच चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारले आहे.
निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरू रघुनाथस्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षड्भुज दत्तात्रेयांचा. याच निरंजन रघुनाथांचे शिष्य झाशीचे नारायण महाराजांना गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. तोही एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे.
सांप्रताचे ध्यान हे नाथसंप्रदायाच्या प्रभावामुळे जनमानसात रुजलेले आहे. भगवान दत्तात्रेय हे अनादि शक्तीचे रहस्य जाणणारे व आद्य आहेत. नाथसंप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविद्येचे प्रवर्तक मानले आहे. आज मितीला नवनाथांमुळे नाथसंप्रदाय ओळखला जात असला तरी आणि नाथसंप्रदायातील अनेकांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जाऊन भिडत असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा आहेत.
या त्रिमूर्तीचे आणि दत्तात्रेयाचे एकीकरण कसे आणि केव्हा घडून आले ? असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा रहाणे स्वाभाविक आहे. इ. स. १२०० पर्यंत दत्तात्रेयाचे स्वरूप एकमुखीच होते; परंतु पुढे पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधराने लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’त मात्र दत्तात्रेयाचे स्वरूप त्रिमूर्ती बनले. हा बदल घडून यायला दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता. त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तीनही देवतांचा आशीर्वाद दत्तजन्माला कारणीभूत आहे.
श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतीकात्मकता 
तीन मुखे – ही ब्रह्मा, विष्णू, महेशांचे प्रतीक आहेत.
सहा हात – विविध प्राचीन ग्रंथांत दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले तरी दत्तसंप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला सहा हात, ब्रह्मा-विष्णू-महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू, तपस्व्याचे ‘सत्त्वा’चे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे ‘रजा’चे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू ‘तमा’चे म्हणजेच संहाराचे प्रतीक मानले जाते.
वेष – पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकाविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्योतक आहे.
धेनु – हे ‘पृथ्वी’चे किंवा ‘माये’चे प्रतीक मानले जाते.
श्वान – दत्तात्रेयांच्या आसपास असणारे चार श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्तसंप्रदायावर प्रारंभी नाथसंप्रदायाचा प्रभाव होता. भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत, तेव्हा त्यांच्याबरोबर गाईंची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. नाथसंप्रदायात ‘आदिगुरु’चे स्थान पावलेला महायोगी ‘दत्तात्रेय’ आपापत:च हे स्वरूप पावला असावा.
निवास – दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबरतळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त ‘गुरुचरित्रा’चे पारायण तेथे आवर्जून करतात.
श्री दत्ताची आरती एक चैतन्य आविष्कार 
दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन'च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल.
दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
- संत एकनाथ
आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ
आता आपण या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.
१. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ याचा अर्थ दत्त हा (कार्यानुरूप) त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.
२. ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’ याचा भावार्थ वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.
३. ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।’ म्हणजे आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.
४. ‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार?
५. ‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’ म्हणजे श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.
६. ‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’ याचा भावार्थ आहे, श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.
७. ‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’ याचा भावार्थ जन्ममरणाच्या फेर्यातून माझी सुटका केली. मला मोक्ष (टीप) दिला, असा आहे.
८. ‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.
‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो आणि भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे.
सतत दत्तनामात राहा
।। शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment