।। ओम गं गणपतये नमः ।।
गणेशोत्सव पुष्प १३
विषय ...घालीन लोटांगण व मंत्र पुष्पांजली 
आरतीनंतर म्हणले जाणारे घालीन लोटांगण या पदाची उत्पत्ती......'घालीन लोटांगण' भजनाची पदं एका कवीची नाहीत? 'घालीन लोटांगण'च्या चार कडव्यांचे चार वेगवेगळे कवी आहेत? हे प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल. याबाबत कदाचित कधी फारसा विचारही केला नसेल. मात्र घालीन लोटांगण हे पद सर्व देवांचे आरती नंतर म्हणले जाते .
देवाची आरती झाली, की सगळे जण तल्लीन होतात ते घालीन लोटांगणाच्या तालावर. पण या भजनात असलेली चारही कडवी एकाच कवीच्या लेखणीतून उतरली नसल्याचं समोर आलं आहे. प्रत्येक कडव्याचा इतिहास जाणून घेतला, तर ही गोष्ट लक्षात येईल.
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा |
पहिलं कडवं लिहिलं आहे संत नामदेव यांनी. म्हणजेच हे कडवं 13 व्या शतकात लिहिलं गेलं आहे.
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव |
दुसरं कडवं 'त्वमेव माता पिता त्वमेव....' हे आहे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातलं. म्हणजेच ते आठव्या शतकात लिहिलं गेलं आहे.
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि
तिसरं कडवं आहे 'कायेनं वाचा मनसेंद्रीयेव्रा...' हे कडवं आहे श्रीमदभगवत पुराणातलं. त्यामुळे त्याचं शतक नेमकं सांगता येणार नाही.
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे
चौथं कडवं आहे 'अच्युतम केशवम'... हे आहे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टममधलं आहे. म्हणजे तेही आठव्या शतकातलं आहे.
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे |
या भजनाचा समारोप आहे 'हरे राम हरे राम...' म्हणजे हे पद ख्रिस्त जन्माच्या 1500 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं आहे.
हे पद एकट्या देवासाठी नाहीच, तर ते प्रत्येक देवतेसाठी आहे. ते एकाने नाही, तर चार वेगवेगळ्या कवींनी लिहिल्याचं सिद्ध होत आहे. बाप्पाच्या भजनाचं हे मिश्रण श्रवणीय आहे. ते गाताना भक्त तल्लीन होतात. रचना कुणाचीही असो, कुणासाठीही असो. ती मनोभावे केली, तर देवापर्यंत पोहोचतो.
मंत्र पुष्पांजली बद्दल थोडंसं -भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे , म्हणून एक दिवस प्रजेने राजाला राजपदावरून बेदखल केलं. राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.
खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा खाणिनेत्राला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे खाणिनेत्राला वारंवार आक्रमणांच्या संकटाला तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने चांगले राज्य केले.
या खाणिनेत्राचा मुलगा आविक्षित प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.
“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित
“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त
हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.
भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय ?
त्यानी प्रजेसाठी खूप अडचणींना तोंड देत एक मोठ्ठ यज्ञ केला.
यज्ञ म्हणजे अनेकांच्या भल्यासाठी केलेलं पवित्र कृत्य .
यज्ञकुंड , समिधा, धूर , मंत्रोच्चार ही कर्मकांडाची अर्थहीन प्रतीकं फक्त आता उरली आहेत, आणि मूळ यज्ञ संकल्पना लोप पावली आहे हा खेदाचा विषय आहे.
यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक टीम बनते. या टीम मधले सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार,तज्ञ,कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या ग्रुपच्या। नेतृत्वाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ म्हणजे विहित कर्म करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे,डोंगरावर झाडी लावणे , जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे , शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.
यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म ! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.
तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी( इंद्र आदि देवांनी ) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी सल्ला , मंत्रणा द्यायचं मान्य केलं.
समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळु हळु मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून , त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ यशस्वी केला.
यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” - अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.
अशाप्रकारे “ यज्ञेन....” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याण कारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता ( कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.
असा हा मंत्र पुष्पांजली चा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा सुख संपन्न समाज, देश आणि विश्व बनवण्याचा परंपरा प्राप्त मार्ग वारंवार मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्र पुष्पांजली आहे.
मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात.
मंत्रपुष्पांजली शिवाय पूजेची सांगता होत नाही.
असा हा मंत्र खाली दिलाय स्पष्ट उच्चार करण्यासाठी.
प्रथम:
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||
द्वितीय:
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।
तृतीय:
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति ॥
चतुर्थ:
ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥



%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80.jpeg)
No comments:
Post a Comment