Monday, June 2, 2025

श्रीगुरूंची मानसपूजा कशी करावी?

श्रीगुरूंची मानसपूजा कशी करावी?
 (संदर्भ ...संकलित लेख केवळ अध्यात्मिक प्रगती साठी )


(1) गुरूभक्ताने प्रथम आपल्या हृदय मंदिरात श्रीगुरूंच्या चरण पादुकांची स्थापना करावी— 

आता हृदय ते आपुले। चौफाळुनिया भले। वरी बैसवू पाऊले। श्री गुरूची।। ज्ञानेश्वरी 15वा अध्याय।। ही संकल्पना श्री ज्ञानदेव माऊलींची आहे, त्यामुळे ती प्रसादरूप असून स्वीकारली पाहिजे. एखाद्या शुभ दिवशी सूर्योदयाला स्नानसंध्या, नामजप, पूजा झाल्यावर श्री गुरूंची प्रार्थना करावी, ‘हे सद्‌गुरूनाथा, अज्ञानामुळे, आळसामुळे आजपर्यंत माझ्याकडून आपली यथार्थ सेवा घडू शकली नाही याबद्दल प्रथम मी तीन वेळा क्षमा मागतो, आपले चरण माझ्या हृदयात नित्य रहावेत ही माझी कळकळीची इच्छा असून तिला आपण अनुमोदन द्यावे, आशिर्वाद असावेत. या अजाण बालकाची इच्छा पुरवून आपण चरणरूपाने माझ्या हृदयात स्थानापन्न व्हावे.' अशी प्रार्थना केल्यानंतर पुढे एक कल्पना करायची आहे ती कल्पना कोणती? तर ‘श्री गुरूंच्या प्रतिमेतून एक दिव्य प्रकाशाचा झोत आपल्याकडे झेपावत येत आहे व तो प्रकाश आपल्या हृदयात प्रवेश करीत आहे' अशी कल्पना करायची आहे. (मन एकाग्र करून वरीलप्रमाणे भावना केल्यास कठीण नाही.) त्यानंतर ‘त्या प्रकाश झोतातूनच श्री गुरूंच्या पादुका हृदयात अवतीर्ण झाल्या आहेत' असा निश्चय करावा. हृदयात रत्नजडीत सिंहासन असून त्या पादुका त्यावर अखंड विराजमान झाल्या आहेत असे कल्पावे. आपल्या हृदयाकाशात पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश पसरलेला असून श्री गुरूंच्या पादुका दिव्य प्रकाशाने उजळून निघाल्या आहेत असे दृश्य पहावे. संतांनी हृदायाकाशाला सहस्त्रदल कमळाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. आता ह्या कमलावर श्री गुरूंची चरणाच्यारूपाने नित्य स्थापना झालेली आहे असेही आपण म्हणू शकतो! ज्या ज्या वेळी आपण अंतर्मुख होऊ त्या त्या वेळी आपल्याला श्री गुरूंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडेल. श्री गुरू म्हणजे परिपूर्ण आनंदच! असे आनंद स्वरूपच जेंव्हा आपल्या हृदयात सामावून राहिले आहे तेथे मग दुःख, शोक, निराशा यांना स्थानच नाही. हृदयस्थ श्री गुरूंच्या सहवासाने सर्व जाणीवच सुखरूप झाल्याने त्या आनंदाला परिसीमाच नाही. नामरूपाने श्री गुरूंचा अनुग्रह झाला की श्री गुरू सूक्ष्मरूपाने नामधारकाजवळच असतात, आता आपण त्यांच्या जवळ जायचे आहे आणि हे मानसपूजेने शक्य होते. पांढऱ्या स्वच्छ, सहस्त्र पाकळयांच्या कमळामध्ये रत्नजडित सिंहासनावर श्री गुरूंच्या पादुका हृदयामध्ये स्थापन झाल्या आता पुढे काय, व मानसपूजेचे स्वरूप काय आहे? *मानसपूजेची वेळ शक्यतो पहाटेची असावी,* काही कारणाने स्नान झाले नसेल तरी मानसपूजा करावी, मात्र आपण स्नान केले आहे ही निदान भावना तरी हवी. बाहेरगावी प्रवासात असताना वेळ काढून मानसपूजा करावी. मानसपूजेची एक *निश्चित वेळ* अवश्य ठरवावी, कारण या पूजेमध्ये भावनेच्या तीव्रतेप्रमाणे तुमचे दैवतही ठरलेल्या वेळी नित्य नियमाने ठरलेल्या वेळी सूक्ष्मरूपाने अवतीर्ण होईल. साधकाच्या दैवताला ही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. पुढे पुढे प्रगत अवस्थेत एखादे दिवशी मानसपूजेला जर उशीर झाला तर साधकाचे मानसपूजेतील दैवत त्याला जाणीव करून देते. पुढे अनेक अनुभव येऊ लागतात. श्री गुरूंची मानसपूजा म्हणजे एका अर्थाने सद्‌गुरूंचा सदेह सहवास लाभणे होय. सगुण उपासनेचा हा कळस आहे असेच समजावे. श्री गुरू व सत्‌ शिष्य यामध्ये प्रत्यक्ष संवाद साधला जातो. श्री गुरूंना रोज भेटणे मानसपूजेने शक्य होते. हृदयात स्थापन झालेल्या या भावरूप पादुका निरंतर कायम राहणार असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षणाला दिव्यत्वाची साथ लाभलेली अनुभवाला येते. साक्षात्‌ श्री गुरूच भावरूपाने हृदयात राहिल्याने साहजिकच नामोपासनेला वेग येतो. श्री गुरूंचे चरण दिव्य असल्याने व येथे पंचमहाभूतांचा त्याला स्पर्शही होत नसल्याने *हृदयस्थ चरणांना पवित्र—अपवित्र, सोवळे ओवळे याचा येथे काडीमात्र संबंध नाही*. श्री गुरूंचे चरण हा परीस आहे. याच्या केवळ भाव सानिध्यानेच साधकाच्या पारमार्थिक—ऐहिक जीवनाचे सोने होईल. हेच चरण भावरूपाने जन्मोजन्मी साधकाला साथ देऊन योग्यवेळी चिरंतन सुखाची प्राप्ती करून देतील. म्हणूनच हृदयस्थ चरणांना वारंवार आठवायचे असते. हे चरण हृदयात घट्ट धरून ठेवायचे आहेत.

*मानसपूजेचा प्रारंभ —* साधकाच्या हृदयकमळात रत्नजडित सिंहासनावर सूक्ष्म रूपाने विराजमान असणाऱ्या श्रीगुरूंना देह स्वरूपात कल्पनेने निर्माण करून मानसपूजेला प्रारंभ करायचा आहे. श्री गुरूंना निर्गुण रूपातून (कल्पनेने) सगुण स्वरूपात आणायचे आहे. अव्यक्त रूपातून त्यांना व्यक्त रूपात आणायचे आहे. आपल्या समोर श्री गुरू प्रत्यक्ष आहेत असे कल्पून त्यांचे पूजन करायचे आहे. ही कल्पना कशी करायची ते पहा —
(1) सुखासन घालून बसावे, डोळे बंद करून अंतर्मुख व्हावे, व कल्पना करण्यास प्रारंभ करावा.
(2) सूर्योदयाची वेळ आहे, आकाशात सूर्य किरणांची लाली पसरली आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकु येत आहे, दूरवर कोठे तरी बासरीचे सूर ऐकू येत आहेत, वाऱ्याची बारीकशी झुळूक अंगाला स्पर्श करून राहिली आहे, त्या झुळूकी बरोबर येणारा मंद सुगंध जाणवत आहे, सर्वत्र आल्हाददायक वातावरण आहे, दुरवरून मंत्र घोषाचा आवाज ऐकु येत आहे, अशा आल्हाददायक वातावरणात मन तल्लीन झालेले असतानाच आपले लक्ष आपल्याच हृदयातील कमळाकडे जाते व त्यात असणाऱ्या श्री गुरूंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडते, श्री गुरूंची प्रत्यक्ष सेवा करण्याची मनाला तीव्र ओढ लागते, मनाच्या या आनंदी अवस्थेतच आपण श्री गुरूंना सूक्ष्मरूपातून स्थूलरूपात प्रगट व्हावे अशी प्रार्थना करतो, प्रार्थना केल्याबरोबर तेजाचा एक झोत हृदयातील पादुकांपासून निघून बाहेर येईल व त्या तेजामधून श्री गुरूंची सुहास्य वदन सगुण मूर्ती प्रगटेल, साक्षात सगुण ब्रम्हच आपल्यापुढे उभे ठाकले आहे असे वाटेल, त्यांच्या पायवर डोके ठेवावे त्या वेळी आनंदाश्रू अनावर होतील कांही क्षणातच भानावर आल्यानंतर मग त्यांना हाताला धरून मखमलीच्या सिंहासनावर बसवावे, त्यांच्या पायातील पादुका अलगद काढून घेऊन जवळच ठेवाव्यात त्यांचे पाय ठेवण्यासाठी एक छोटा चौरंग घेऊन त्यावर चांदीचे ताम्हण ठेवून, त्यात श्री गुरूंचे चरण अलगद ठेवावेत.
*पाद्यपूजा —* आता श्री गुरूंच्या चरंणावर प्रथम पाणी घालावे, नंतर चांदीच्या भांडयाने दूध घालावे, दोन्ही पाय दुधाने चांगले माखावेत नंतर ऋतुमानानुसार कोमट व थंड पाणी पुन्हा पायावर घालून पाऊले चांगली स्वच्छ धुवावीत व ताम्हण बाजुला ठेवून स्वच्छ कोरड्या रेशमी वस्त्राने दोन्ही पाऊले पुसून कोरडी करावीत व चौरंगावर त्यांचे पाय अलगदपणे ठेवावेत. 
*मुखमार्जन —* श्री गुरूंच्या समोर एक तस्त ठेवून चूळ भरण्यासाठी हातावर ऋतुमानानुसार थंड व उष्ण पाणी द्यावे, सर्व चेहऱ्यासही पाणी लावून, पुसून हात व चेहरा कोरडे करावेत, घोटभर पाणी चांदीच्या भांड्यात पिण्यास द्यावे.
*गंध —* केशरी गंधाचा एक ठिपका हलक्या हाताने श्री गुरूंच्या दोन्ही भुवनांमध्ये लावावा.
*वस्त्र —* सुंदर मऊ शाल खांद्यावर हळूवार हाताने घालावी.
*पुष्प —* श्री गुरूंच्या चरंणावर तुळसी पत्रे वहावीत, तुळशीचा हार गळ्यात घालावा.
*धूप —* उत्तम वासाची धूपबत्ती लावून ठेवावी.
*दीप —* तुपाचे निरांजन लावावे.
*नैवेद्य —* चांदीच्या ताटात संपुर्ण भोजन, आपण स्वतः प्रेमाने वाढावे, आग्रह करावा, मध्ये पाणी पिण्यास द्यावे, वरण भात तूप, एक भाजी, उसळ, आमटी, पोळी, एखादा गोड पदार्थ (शिरा/बासुंदी वा सुधारस, श्रीखंड) इत्यादि पदार्थ ताटात असावेत. संपुर्ण जेवण झाल्यावर ताट बाजूस सारून एक तस्त घेऊन त्यांच्या हातावर पाणी घालावे, हस्तमुख प्रक्षालन झाल्यानंतर हात, तोंड पुसण्यास कोरडे रेशमी वस्त्र द्यावे. थोडया वेळाने आरतीची तयारी करावी. 
*आरती —* नीरांजन हातात घेऊन श्री गुरूंची आरती करावी. मंत्रपुष्पांंजली येत असल्यास म्हणावी, सर्व झाल्यावर श्री गुरूंना एक प्रदक्षिणा घालावी.
*प्रार्थना व नमस्कार —* श्री गुरूंच्या समोर हात जोडून बसावे. आपले मनोगत, आपल्या अडी अडचणी, आशा—निराशा, सुखदुःख सर्व ही मोकळ्या मनाने निवेदन करावे.
*म्हणावे —* ‘जे घडले किंवा घडेल ते आपल्या इच्छेनुसारच आणि म्हणून माझ्या कल्याणाचेच असणार, त्यात मला समाधान द्यावे'. त्यानंतर नित्याची श्री गुरूंची प्रार्थना करावी, चरणांवर अनन्य शरणागतीने डोके ठेवावे श्री गुरू आपल्या मस्तकावर वरदहस्त ठेवीत आहेत असे कल्पावे. नंतर शेष नैवेद्य ग्रहण करावा तृप्त व्हावे. नंतर श्री गुरूंना विश्रांती घेण्यासाठी दोन्ही कर जोडून प्रार्थना करावी व ते उत्तम पलंगावर पहुडले की त्यांचे हातपाय चेपून हलक्या हाताने सुंदर शाल त्यांच्या अंगावर घालावी, त्यांची विश्रांती होई पर्यंत, त्यांच्या चरणांशी बसून असावे, जप करीत रहावे, थोड्या वेळाने त्यांची विश्रांती होऊन ते आसनस्थ झाले की हात जोडून श्री गुरूंना स्थूलरूपातून सूक्ष्मरूपात हृदय कमलावर विराजमान होण्यासाठी विनवणी करावी. श्री गुरूंच्या सगुण रूपातून एक प्रकाश शलाका (तेजाचा झोत) निर्माण होईल आणि आपल्या हृदयात तो अंतर्धान पावेल, त्या ठिकाणी (हृदय कमळामध्ये) श्री गुरूंच्या सतेज पादुका दिसतील, त्याचे दर्शन घ्यावे. शेवटी जागेपणीच पहात असलेल्या मानसपूजेच्या स्वप्नातून आपण भानावर येऊ. अशी मानसपूजा फारच लवकर संपल्याबद्दल आपल्याला हुरहुर वाटल्यास आपण मानसपूजेत रमलो होतो असे समजावे.

मानसपूजेची ही एक प्रतिनिधिक पद्धत सांगितलेली आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृति' या न्यायाने साधकाने आपल्याला आवडेल ती पद्धत घ्यावी. शेवटी भाव तेथे तेथे देव हेच खरे. सूक्ष्म जगतात, देवी देवता, ऋषी, मुनि, दिव्यशक्ती, महापुरूष असतात, सूक्ष्म जग हे अदृष्ट (अदृश्य) असते, अव्यक्त असते, सहजासहजी सामान्य माणसाला हे दिसत नाही, यासाठी माणसाचे मन सूक्ष्म व व्यापक झाले पाहिजे. मनाचे दोन भाग पडतात एक विचारी मन व विकारी मन. मनामध्ये जड जगताचे, देहाचे चिंतन करून करून विकारयुक्त जडपणा आलेला असतो त्यामुळे ते सूक्ष्म व व्यापक, हलके, तरल होत नाही. मन जसे जड आहे तसेच त्यात थोडा चिदांशही आहे. आत्म्याच्या जवळ असल्याने आत्मस्वरूपाचे चैतन्य थोडे फार मनातही आलेले असते. आपण आपल्याला विसरून, जगाला विसरून देवाची उपासना केली की मनाचा जडपणा कमी होऊन ते चैतन्याकडे झुकू लागते. मग या ठिकाणी निरंतर उपासनेने मनातील जडपणा जातो त्यातील विकार, आसक्ती कमी होतात, चैतन्याचा अंश मनात वाढल्याने ते सूक्ष्म होते, व्यापक होते, स्वतःच्या शरीराचा धरलेला अतीव अहंकार, अभिमान कमी होतो, ‘मी मी', ‘माझे माझे' कमी होते, व मन निर्मळ बनते, त्यात सात्विक गुण वाढतो, रजोगुणाची चंचलता जाऊन ते स्थिर व शांत होते. योग्य निर्णय घेता येतात. अशा निर्मळ मनात देवतांचा प्रवेश होतो, त्यांची कृपा होते. साधक परमार्थात मध्यम अधिकारी बनतो, श्री गुरूंचे मार्गदर्शन होत राहते, त्यांची दर्शने होतात, (मनात देवी देवतांचा प्रवेश होणे म्हणजे, स्वप्न दृष्टांत होणे, श्री गुरूंचे मार्गदर्शन व दर्शने ही स्वप्नातच होतात). निश्चित वेळेला नियमाने मानसपूजा करू लागले की दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. एखाद्या दिवशी मानसपूजेला जर उशीर झाला तर साधकाचे दैवत त्यास जाणीव करून देते, इतकी परस्पर प्रेमाची प्रेममय अवस्था दोघांचीही होते. मानसपूजा म्हणजे सूक्ष्माच्या साम्राज्यामध्ये शिरण्याचा एक अनुभव सिद्ध व संतमान्य मार्ग आहे. मानसपूजेने सामान्यातला सामान्य साधकही सूक्ष्माच्या कक्षेत सहज प्रवेश करू शकतो, *सूक्ष्माचा अनुभव घेण्यासाठी अन्य कोणताही मार्ग इतका सुलभ नाही*. सुरूवातीला देहभान विसरून मनाची एकाग्रता व्हायला थोडा वेळ लागेल तरी निराश होऊ नये, जाणीवपूर्वक अंतर्मुख होण्याची मनाला सवय नसल्याने असे होते, तरीही आपापल्या पात्रतेप्रमाणे साधारण महिना दोन महिन्यात बऱ्यापैकी मानसपूजेत स्थिरता येऊ लागते असा सर्वांचाच अनुभव आहे. साधारणपणे कमीतकमी दहा ते पंधरा मिनिटे लागतात, यात मन रंगायला लागले की ही वेळ आपणहूनच वाढते, पुढे पुढे भाव समाधीही लागते असा अनेकांचा अनुभव आहे, ही वरची अवस्था असली तरी मानसपूजा सिद्ध झाल्यावर हे अशक्य नाही.
 म्हणून आपण ज्या दत्तक्षेत्री नियमित जाता त्या पादुका हृदयात स्थित करा व मानसपूजा करा श्रद्धा असलेने  आपण मानस पूजेत लवकर स्थिर व्हाल .
असो स्मरा स्मरा हो दत्त गुरू ।

No comments:

Post a Comment