Sunday, February 2, 2025

श्रीकृष्णावेणी उत्सव व गोपाळकाला.. श्री क्षेत्र नृसिंहवाडी

 


श्रीकृष्णावेणी उत्सव व गोपाळकाला..  श्री क्षेत्र नृसिंहवाडी 
(महाराजांचे राजधानीतील प्रमुख व प्रासादिक महोत्सव )


भक्तचित्तस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी |

भक्ततृष्णा हरे देवि कृष्णावेणी नमोऽस्तु ते ||


दिनांक ४ फेब्रुवारी मंगळवारी रथसप्तमी च्या मूहूर्तावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी क्षेत्री प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुरू केलेला कृष्णावेणी उत्सव सुरू होतो आहे या निमित्ताने आपण कृष्णावेणी या नामाचा नेमका अर्थ काय होतो याचे चिंतन करू!

स्वामी महाराजांनी रचलेल्या कृष्णा लहरी वरील भाष्यामधे कृष्णावेण्यै नमः किंवा कृष्णावेणीभ्यां नमः असा एकवचनी आणि द्विवचनी नामनिर्देश केलेला आढळतो.

म्हणजे कृष्णावेणी हे एकवचनी नाम आहे तसेच ते कृष्णा + वेणी = अशा दोन नामांनी एकत्रित बनलेले आहे असे दिसते!

मग प्रश्न असा आहे की जर ही दोन नावे आहेत तर मग मातेचा श्रीविग्रह एकच कसा? कारण माहुली येथे दोघींचा स्वतंत्र अर्चाविग्रह आहे!

सर्वसिद्धिप्रदायक वेण्णानदी अत्यंत वेगाने येऊन मिळाल्याने इथून पुढे ती कृष्णावेणी म्हणून प्रसिद्ध झाली, अशी व्याख्या कृष्णा माहात्म्यात येते जलसमूह किंवा जलप्रवाह म्हणजे वेणी होय!

वेणीचा दुसरा आणि सर्वांना माहित असलेला अर्थ म्हणजे केसांची वेणी!

पण वेणी म्हणजे नदी या अर्थाने कृष्णावेणी असा अर्थ ध्वनित होतो!

गंगा यमुना सरस्वती यांच्या संगमाला काय म्हणतात त्रि_-वेणी संगम!

मग त्रि म्हणजे तीन आणि वेणी म्हणजे नदीप्रवाह होय!

म्हणून कृष्णामाईस कृष्णावेणीमाता म्हणताना आपण एकवचनी नामाने कृष्णानदी तर द्विवचनी नामाने कृष्णामाई वेण्णामाई असाही अर्थ घेऊ शकतो .

माघ शु. ७ म्हणजेच रथसप्तमीला ला सुर्यनारायण सात घोड्यांच्या रथावर स्वार होतात व पुर्ण क्षमतेने पृथ्वीवर अवतरतात व थंडी संपुन खर्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते. 


*पण याच रथसप्तमी पासुनश्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे'श्री कृष्णावेणी उत्सव'ही सुरु होतो. ज्या, ज्या ठिकाणातुन कृष्णा नदी वाहते अशा सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पण आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा करतात. मात्र श्री क्षेत्र नृसिंहवाडीला याचे महत्व जास्त. कारण ईशान्येकडुन कृष्णेसह वेणी तर पश्चिमेकडुन पंचगंगा अशा सप्त नद्यांचा संगम, अष्टतिर्थे, साक्षात विष्णुंचा अवतार असलेल्या नृसिंहांचा  आशिर्वाद लाभलेल्या, पवित्र अशा औदुंबर वृक्षाचे अस्तित्व असलेल्या व दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणार्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे १२ वर्षांचे वास्तव्य व पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या उत्सवास श्री टेंबे स्वामी महाराजांच्या आशिर्वादामुळे, प्रेरणेमुळे आलेले भव्य स्वरुप यामुळे वाडीतील कृष्णावेणी उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे. प्रत्येक दत्तभक्तांनी या पवित्र उत्सवाचे काळात कृष्णामाई व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा .


उत्सवाच्या दिवशी सकाळी मानकरी ब्राह्मणाच्या घरातुन वाजत गाजत अतिशय उत्साहात श्री कृष्णावेणी मातेची मुर्ती मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला(उत्तरेला) भव्य व आकर्षक शामियान्यामध्ये, सुशोभित केलेल्या जागेवर वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांच्या विधीयुक्त संकल्पाने प्रतिष्ठापित केली जाते. माघ पौर्णिमेपर्यंत चालणार्या या उत्सवामध्ये श्री कृष्णावेणी मातेची दैनंदिन पुजा, आरती इ. व्यतिरिक्त ऋकसंहिता, आरण्यक, श्री गुरुचरित्र, कृष्णा महात्म्य, श्रीमत् भागवत, श्री सुक्त, रुद्रैकादशनी, सप्तशती इ. पारायणे व रुद्र स्वाहाकार, कृष्णालहरी पठण, पुराण, प्रवचन, किर्तन, भजन व याशिवाय शास्त्रीय गायन- वादन इ. कार्यक्रम होतात. पौर्णिमेला रात्री  करवीर पिठाच्या शंकराचार्यांचे आशीर्वचन असते. त्यानंतर कृष्णावेणी उत्सवाची सांगता होते.

त्यानंतरचा दिवस म्हणजे माघ कृ. प्रतिपदा हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या श्री शैल्य गमनाचा दिवस असल्याने प्रतिपदा ते पंचमी असे ५ दिवस गोपाळकाला नावाने साजरे केले जातात. "मी येथे शरिराने जरी नसलो तरी जे भक्त माझी मनापासुन भक्ती करतात त्यांनी केव्हाही माझी आठवण काढली, धावा केला तरी मी त्यांच्यासाठी कायमच उपलब्ध आहे" असे आश्वासन श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्यगमनाच्या वेळी भक्तांना दिलेले असल्याने ५ दिवस व रात्रीही अखंडपणे अशा पद्धतीने हा गोपाळकाला उत्सव केला जातो. यानिमित्ताने मंदिर व उत्सवमुर्ती सजविण्यात येते. उत्सवाच्या मुख्य दिवशी(प्रतिपदेला) सध्याच्या भाजी मंडईच्या/पार्किंगच्या जागेत(अर्थातच त्या जागेवरील सर्व अतिक्रमणे हटवुन, जागा शुद्ध, पवित्र करुनच)  सोवळ्याने नैवैद्य केला जातो. यालाच 'बनातील प्रसाद' असे म्हणतात. इतर वेळी रोज दुपारी होणारी महापुजा या ५ दिवशी मध्यरात्री १२.३० वा असते व त्यानंतर धुप, दिप, आरती व पालखी असते. या ५ दिवशीही भक्तीगीते, भजन, प्रवचन किर्तन इ. कार्यक्रम असतातच. पंचमीला म्हणजे औदुंबर पंचमीला या गोपाळकाला उत्सवाची सांगता होते. औदुंबर पंचमीचे एक विशेष भावनिक महत्व आहे  ... श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज माघ व १ श्री शैल्य गमन करताच गाणगापूर येथील भक्त तर दुःखी झालेच पण  महाराजांनी  १२ वर्षे वास्तव्य केलेले श्री क्षेत्र नृसिंह वाडीत भक्त खूप दुःखी झाले  मन लागेना म्हणून तेथे महाराज पुन्हा प्रगट झाले ५ दिवस  भक्तगणांनी अहोरात्र  सेवा केली .आपण  स्मतृगामी असल्याची प्रचिती दिली भक्त आनंदी झाले व औदुंबर पंचमी ला महाराज पुन्हा अदृश्य झाले


अशा प्रकारे ९ दिवस कृष्णावेणी उत्सव व पुढील ५ दिवस गोपाळकाला उत्सव असा हा नृसिंहवाडीमधील सर्वात प्रदिर्घ व १४ दिवस चालणारा महोत्सव संपन्न होतो.

।।श्रीकृष्णावेणी माता की जय।।

No comments:

Post a Comment