Tuesday, January 28, 2025

श्री दत्तावताराचे प्रयोजन

 


दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी !
औदुंबरी नित्य वसे, भक्‍तकाम पुरवितसे !
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी !
अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय !
त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी !
विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन !
ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी !!
!! ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय !!

श्री दत्तावताराचे प्रयोजन


श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते; हे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या श्रीदत्तलीलामृताब्धिसार या ग्रंथातल्या पहिल्या दोन श्लोकात आले आहे. श्रीभगवान दत्तात्रेयांचे वर्णन करतांना श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज  म्हणतात,

ॐकार ज्याचा वाचक | जगध्देतू धीप्रेरक | तोचि देव सच्चित्सुख | एक दत्त || १ ||
दत्त अज निराकार | स्वेच्छामात्रें हो साकार | अव्ययात्मा भक्ताधार | भक्तिगम्य || २ ||

अर्थ:
आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्या बद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. || १ ||
हा जन्म रहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छामात्रे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. || २ ||

श्री दत्तावताराचे स्वरुप 

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच.                  

श्री दत्तावताराच्या स्वरुपाचे चिंतन  खालील शब्दात करता येईल,

मालाकमंडलुरध: करयस्त्र युग्मे मध्यस्थ पाणि युगुले डमरू त्रिशुले ।
यस्यस्त ऊर्ध्वकरयो: शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवरदं भुजषट्क युक्तम् ॥

सगुण परमात्म्याची पूजा ध्यानमंत्राने सुरू होते. अर्थात या ध्यानमंत्रामुळेच आराध्य परमात्मा भक्तापुढे साकार होतो. भगवान दत्तगुरूंच्या वरील ध्यानमंत्रामुळेच त्यांचे रूप भक्तांपुढे अभिव्यक्त होते. परमात्मा भगवान श्रीदत्तगुरूंच्या खालच्या दोन हातांत माळ आणि कमंडलु, मधल्या दोन हातांत डमरू, त्रिशुळ आणि वरच्या दोन हातांत शंख आणि सुदर्शनचक्र अशा प्रकारची आयुधे षड्भुजांमध्ये धारण करणाऱ्या, भक्तांना वर देणाऱ्या, मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक, अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

गुजरातच्या प्रख्यात दत्तभक्त श्री स्वामी रंगावधूतांनीसुद्धा ‘रंग रहस्य’ या स्तोत्रग्रंथामध्ये आपल्या अनुभूतीनुसार भगवान श्री दत्तात्रेयांचा ध्यानमंत्र प्रस्तुत केलेला आहे, तर महानुभाव नाथपंथियांनी स्वानुभावानुसार भगवान श्री दत्तात्रेयांना साकार केलेले आहे. 

“भस्मोद्धलित जराधरं विभुवर” अशा शब्दावलीत शांडिल्य उपनिषदांनी भगवान श्री दत्तात्रेयांची प्रार्थना केलेली आहे तर गुलाबरावांना सुवर्णपात्र हातात घेऊन भिक्षेसाठी देशाटन करणाऱ्या भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले. प्राय: सर्वत्र भगवान श्री दत्तात्रेय यतिवेषात दिसतात. परंतु ‘दत्तात्रेय सर्वस्व’ या प्राचीन ग्रंथात भगवान श्री दत्तात्रेय राजविलासी आणि ऐश्वर्यशाली असल्याचा उल्लेख आहे. महान तपस्वी अत्रिऋषी आणि श्रेष्ठ पतिव्रता अनुसूया या दांपत्याचे ठिकाणी भगवान श्री दत्तात्रेयांचा आविर्भाव झाला.

महासाध्वी अनुसया माता बालक स्वरूप त्रिमूर्तींना भोजन घालताना
महासाध्वी अनुसया माता बालक स्वरूप त्रिमूर्तींना भोजन घालताना

श्री दत्तजन्म कथा

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदरानें स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचपुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव ! पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दलअसलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव 'साध्वी व पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेल्या शिवाय राहिली नाही. नारदांचे नांवच मुळी' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गाइले, सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्यात्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश) क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असून, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे.

“आसनी बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥

हे वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरिता आले असावे. यांस जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानिहोईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागे आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, - 
"थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे.त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले

बाल रुप दत्तात्रय
पाळण्यातील बाल स्वरूपातील दत्तमहाराज 

हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥

तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक! अगदीं लहान! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-

कंचुकोसहित परिधान । फेडूनि ठेवी न लगतां क्षण । नग्न होवोनियां जाण । बाळांजवळी बैसतसे ॥
बाळें घेऊनि मांडोवरी । स्तनीं लावी जेव्हां सुंदरी । पान्हा फुटला ते अवसरी । देखोनि सती आनंदे ॥

अशा तर्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली ती बालके रडू लागली. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिली. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्यांच ठिकाणीं ती तीन बालके ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते कांहीच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.

ऐसें सांगता ब्रह्मपुंत्र । तिघी मिळाल्या एकत्र । जोडोनियां पाणिपात्र । नारदासी विचारिती ।

तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार (पति) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले.तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हां तीं बालकेंपूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेने 'तिघे बालक (ब्रह्मा - विष्णु- महेश) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात,

बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात
बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात

मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर । तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं॥
वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण । ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय ! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.

श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.